उरण (सुनिल ठाकूर )
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे च्या प्राणिशास्त्र विभाग च्या वतीने राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त आहार समुपदेशन अभियान श्रीमती भागूबाई चांगु ठाकूर विद्यालय, द्रोणागिरी च्या विदयार्थी व माता पालक ह्यांच्यासाठी घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवातीस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका
अनुराधा काटे मॅडम ह्यांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्प गुच्छ देऊन केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. वीर वाजेकर कॉलेचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ आमोद ठक्कर ह्यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतात दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक राहावे. पोषण ही मूलभूत गरज आहे आणि निरोगी जीवन जगण्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता नसल्यामुळे, रुग्णांची संख्या आरोग्य सुविधांपेक्षा जास्त आहे. आजची बिघडलेली जीवनशैली आणि चुकीचे खाणे हे याचे प्रमुख कारण आहे. निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. समृद्ध भारत उभारणीसाठीसाठी सशक्त युवक घडविणे अत्यन्त गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थी वर्गाला बाजारातील फास्ट फूड च्या विळख्यातून बाहेर काढणे व पारंपारिक घरगुती सकस आहार घेण्यास प्रवृत्त करण्याची आवश्यकता विषद केली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या योग आहार संस्थेच्या प्राजक्ता सरवया पवार ह्यांनी आहाराचे प्रकार,आहाराची वेळ व आहाराचे प्रमाण ह्याचे विश्लेषण करून सकस आहाराची माहिती करून दिली. आजच्या विद्यार्थ्यांना फास्ट फूड ची चटक लागलेलीआहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांमध्ये वजन वाढणे, आळस, दातांचे, पचनाचे व इतर आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच त्याच्या परिणामांची माहिती करून दिली व त्यापासून आपल्याला दूर राहायचे असल्यास आपण सकस आहार वेळेवर घेणे, सकस आहारातील विविध घटक व त्याची शरीरात असणारे कार्य व सदृढ आरोग्यासाठी ची आवश्यकता उदाहरणासाहित पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे माहीत करून दिले. ह्यावेळेस त्यांनी कडधान्य, दुध, सुकामेवा, फळं, भाज्या सॅलड ईत्यादी आपल्या आहारात का आवश्यक आहेत हे शास्त्रीय रित्या समजावून सांगितले.
त्याच बरोबर त्यांनी सकस आहार सोबत योग किंवा व्यायाम व मेडिटेशन ची आवश्यकता उत्तम आरोग्यासाठी स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांच्या माता पालक ह्यांनी आपल्या पाल्याच्या आहाराविषयी अनेक प्रश्न विचारले. तसेच आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी आहाराच्या समस्या मांडल्या संयोजकांनी सर्व शंकांचे निरसन करून समर्पक उत्तरे दिली. तसेच प्रा डॉ आमोद ठक्कर ह्यांनी विद्यार्थ्यांच्या आवडीचे कॉर्न चाट, स्पराऊट भेळ, कडधान्याचे नगेट्स, थालीपीठ, दलिया, घरगूती फ्रॅंकी इत्यादी अनेक पदार्थांची रेसिपी सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कुल चेरमन श्री चंद्रकांत घरत ह्यांनी मोलाचे सहकार्य केले.
आभार प्रदर्शन मोना पाटील ह्यांनी केले.
कार्यक्रमास १९० पालक व विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर्स च्या सहाय्याने फास्ट फूड मुळे होणाऱ्या दुष्परिणामा बाबत जनजागृती केली, प्राध्यापक पंकज भोये ह्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले.